बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंत निकालात ९ ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तसेच ४ बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे. जवळपास १४७ पैकी १४ बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. दरम्यान, यवतमाळमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला १८ पैकी १४ जागी विजयी मिळवला आहे.
संजय राठोड गटाचे फक्त ४ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांचा हा मोठा विजय समजला जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आहे. पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष हा बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती. अखेरीस कॅबिनेट मंत्र्यालाच त्यांच्याच जिल्ह्यात महाविकास आघाडीने धूळ चारली आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. तिवसामधील सर्व १८ जागेचे निकाल हाती आले असून १८ पैकी १८ जागी आमदार यशोमती ठाकूर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआ विजयी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. सिन्नर कृषी बाजार समितीची निवडणूक टाय झाली आहे. शेतकरी विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनलला ९-९ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचे शेतकरी पॅनल आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात चिठ्ठी पद्धतीने सभापतीची निवड करावी लागणार आहे.
हेही वाचा : Nasal Vaccine : ठाण्यात नाकाद्वारे लसीकरण, पालिकेला मिळाला अडीचशे लशींचा साठा