मुंबई : राज्यात नामांतराचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. पुण्याचे नाव ‘जिजाऊ नगर’ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर, पुण्याचे नाव जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यावर सावध प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचे ठरते, अशा कानपिचक्या दिल्या आहेत.
पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे, ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार असल्याचे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. मराठा सेवा संघ द्वारा आयोजित शिवधर्मपिठ सिंदखेड राजा येथे गुरुवारी जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/9mt46cpYWD
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. सगळीच नावे चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. पिंपरी चिंचवडलाही पुण्याचाच भाग समजले जाते. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे, असे सांगत, मूळ पुणेकरांना काय वाटते, याचाही विचार करावा लागेल. उगीचच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचे ठरते, अशा कानपिचक्या अजित पवार यांनी दिल्या.
सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रचंड प्रश्न आहेत. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि मूळ विषय भरकटवायचे, असे सध्या सुरू आहे. त्यावर आमच्यासारख्या राजकीय नेत्याला बोलणे अवघड होते. कारण तो भावनिक विषय असतो. म्हणून माझी विनंती आहे की सर्वांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मविआच्या नावांना भाजपाचा विरोध, बीडीडी पुनर्विकासाच्या नामकरणावरून राजकारण तापणार?