उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकत्र येत निषेध रॅली काढत निषेध व्यक्त केला. हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत सर्व तालुका तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
उतरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बंद यशस्वी करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. या बंदला कणकवली तालुक्यात चांगला तर इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील बहुतेक बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या, फार कमी प्रमाणात दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बाजारपेठामध्ये फिरून काही काळापुरती शेतकऱ्यांसाठी दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन केल्यानंतर काही बाजारपेठामध्ये दुपार पर्यंत काही दुकाने बंद ठेवण्यात आली.
कणकवलीत शिवसेना आमदार वैभव नाईक आणि इतर नेत्यांनी कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड, दोडामार्ग या शहरामध्ये रॅली काढून निषेध व्यक्त केला. निषेधाच्या घोषणाही दिल्या आणि शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार सहन करणार नाही, हत्याकांडमधील गुन्हेगारांवर कडक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालयाच्या समोर निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर बंदला प्रतिसाद न मिळाल्याने मात्र विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत बंद अयशस्वी ठरला आणि केवळ नेत्यांनी स्टंटबाजी केली असून बंदला मिळालेल्या प्रतिसादावरुन महाविकास आघाडीची ताकद कमी झाली असल्याचे स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – Maharashtra Bandh: हा तर ‘शासकीय इतमामातील’ बंद; आशिष शेलार यांची टीका