मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आज, सोमवारी विधानसभा अध्यक्ष राुहल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निर्णय दिला. त्यानंतरही याप्रकरणी निर्णय न झाल्याने ठाकरे गट नाराज आहे. त्यावरून भाजपा आमदार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) September 25, 2023
राज्यात गेल्यावर्षी जूनमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर या सत्तासंघर्षाची सुनावणी सुर्वोच्च न्यायालयात झाली. यावर्षी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे सांगितले होते. याबाबत आपल्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा ठाकरे गटाला आहे. मात्र, चार महिने झाले तरी, याप्रकरणी निर्णय न झाल्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा वेळकाढूपणा सुरू असल्याचा सूर ठाकरे गटाचा आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत तसेच आमदार अंबादास दानवे यांनी थेट राहुल नार्वेकर यांच्यावर ठपका ठेवला आहे.
हेही वाचा – व्याख्यान द्यायला आले, पण शेवटी आख्यान झाले, ठाकरे गटाचे अमित शहांवर जोरदार टीकास्त्र
त्याचा संदर्भ देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहून संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या पक्षांतरबंदीविषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये या दोन्ही नेत्यांचे राजकीय हितसंबध आहेत. स्फोटक भाष्य करून अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांच्या बोलण्यावर तत्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. संजय राऊत व अंबादास दानवे यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तत्काळ सुपूर्द करावे व यावर विनाविलंब निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.