शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. आता खातेवाटप झाल्यानंतर शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्यांना आता बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगल्यावर स्थान मिळालं आहे. दरम्यान, भाजप आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना रायगड हा बंगला दिल्यामुळे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यात नाराजीचा सूर उमटल्याचं सांगितलं जात आहे.
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन, दिपक केसरकर रामटेक, शंभूराज देसाई ब-४ पावनगड, अब्दुल सत्तार ब-७ पन्हाळगड, उदय सामंत मुक्तागिरी, संजय राठोड शिवनेरी, संदिपान भुमरे ब-२ रत्नसिंधु, सुरेश खाडे ज्ञानेश्वरी, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लोहगड बंगल्याची चावी मिळाली आहे.
मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप करण्यात आलं. यावरून विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहाटी ट्रीप आणि गद्दारीच्या मुद्यावरून टार्गेट केलं जात आहे.
अखेर ‘रायगडा’वर रवींद्र चव्हाणांची स्वारी!
रायगड या बंगल्यावरून धुसफूस सुरूच झाल्याचे सांगण्यात येते होते. हा बंगला विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना हवा होता. त्यांच्या स्वीय सचिवांसह काही कर्मचारी बंगल्याची पाहाणी करत असतानाच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले देखील त्या बंगल्यावर आले. रवींद्र चव्हाण यांनाही हाच बंगला हवा आहे आणि ते मंत्री असल्याने त्यांना हा बंगला मिळेल, असे सांगण्यात येत होते.
दुसरीकडे भरत गोगावले हे रायगडसाठी आग्रही होते. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात आपला समावेश होणारच आहे, त्यामुळे हा बंगला आपल्याला मिळू शकतो, असे त्यांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना सांगितले होते. पण आता बंगल्यांचं वाटप करण्यात आलं असून रविंद्र चव्हाण यांना रायगड बंगला देण्यात आला आहे. त्यामुळे भरत गोगावले यांच्यामध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : ओरिजनल शिवसेना आमचीच, शिंदे-फिंदे गट काय नाय.., आमदार संतोष बांगर यांचा दावा