शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटाकडून ऐकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत. आतापर्यंत शिंदे गटात ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. तर फक्त १० आमदार ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातले उरलेले आमदार शिंदे गटात येणार असल्याचं मोठं विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिरसाट म्हणाले की, जेव्हा शिंदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की, उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपत आहे. तेच प्रकार आजही चालू आहेत. पक्षाबद्दल कुणाला देणं-घेणं आहे की नाही. स्वत:ची टीमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे.
हे लोकं कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केलंय का?, ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का?, त्यांच्या पक्षातल्या उरलेल्या आमदारांना विचारा तर खरं की, ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
येत्या ८ ते १० दिवसांमध्ये ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात येतील. हा जो सकाळचा साडेनऊचा भोंगा चालतो. त्याला लोकही कंटाळले आहेत. पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांना पुढे निवडणुकाही लढवायच्या आहेत. त्यामुळे जर हे असेच बोंबलत बसले तर ते निवडणूक लढवायच्याही मनस्थितीत राहणार नाहीत, असंही शिरसाट म्हणाले.
हेही वाचा : …तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेनं मारतील; राणेंचा नवा वाद