विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी सभागृहात लक्षवेधी बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी लक्षवेदीच्या बैठकीत 2015 च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळयाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. तसेच, फडणवीसांचे उत्तर न पटल्याने सुहास कांदे यांनी ‘उपमुख्यमंत्री साहेब गोलमाल उत्तर देऊ नका’, अशा शब्दांत पुन्हा त्यांना प्रत्युत्तर दिले. (MLA Suhas Kande lashed out at on DCM Fadnavis in the assembly)
या मुद्द्यावर बोलताना सुहास कांदे यांनी “अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी अंधेरी आरटिओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. या संदर्भात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. जवळपास हा घोटाळा 1160 कोटी रुपयांचा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले. त्यात तत्कालीन मंत्री असलेले नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदयाचे मतदार संघात जोरदार स्वागतही करण्यात आले. जस काही ते पाकिस्तानच्या बोर्डावर लढून आले”, असे म्हटले.
उच्च न्यायालयात अपील करायचे असा एक शासन निर्णय विधी विभागाने काढला. मात्र, त्याच विधी विभागाने पुन्हा पत्र काढून अपील करण्याची गरज नाही असे सांगितले. असे काय झाल की, विधी विभागाला आपला निर्णय बदलावा लागला. विधी व न्याय विभागाने कोणाच्या दबावाखाली हे पत्र काढले? याची चौकशी होणार का? का ते माजी मंत्री बाहूबली आहेत, त्यांनी ब्लॅकमेल केल का? यांसारखे अनेक प्रश्न सुहास कांदे यांनी उपस्थित केले. तसेच, या संदर्भात आपण पुन्हा अपील करणार असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले.
“हे दोन जीआर रद्द करण्याचा निर्णय अधिकारी यांनी घेतला नाही. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात केला आहे. त्यामुळे याची पुन्हा तपासणी करता येते का हे पाहिलं जाईल तसेच पुन्हा अपील करता येईल का या संदर्भात चौकशी केली जाईल”, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुहास कांदे यांना दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर सुहास कांदे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस तुम्ही जे उत्तर दिले आहे त्यावर समाधानी नाही. उद्धव ठाकरे यांनी असे निर्णय घेतल्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आलो आहे. आम्ही तुमच्याकडे बघून आलो आहे. गोलमोल उत्तर देऊ नका. जर समजा तुम्ही आधीच्या निर्णयाला स्थगिती देत असाल, तर हे परिपत्रक काढले ते मागे घ्या. भ्रष्टाचार आपल्याला काढायचे असेल तर हा निर्णय रद्द केला पाहिजे. पंतप्रधान यांनी भ्रष्टाचार मुक्त घोषणा केली आहे”, अशा शब्दांत कांदे यांनी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा – राज्यात धर्मांतराचे रॅकेट, ‘रेट कार्ड’द्वारे तरुणांना आर्थिक बळ; नितेश राणेंचा विधानसभेत आरोप