मुंबई: भाजपने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही आमदार नाराज आहेत. याऊलट काही खास आमदार थेट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. (MLAs from Ajit Pawar Dada group disgruntled some trying to defect to BJP Big statement of Rohit Pawar)
रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी ते नाराज आहेत हे जाणवंत, पण नाराजगी वेगवेगळ्या कारणांवर असू शकते. भाजपची प्रथा अशी आहे, नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आणायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची आणि ती आश्वासनं पाळायची नाहीत, त्या लोकनेत्याची ताकद भाजप हळूहळू कमी करतं, तीच गोष्ट अजित पवार यांच्याबाबतीत भाजपने केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे, असं रोहित पवार म्हणाले.
भाजपकडून दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्यानं आमदारांमध्ये नाराजी आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. लोकसभेपुरते नाराज आमदारांना वापरतील, सुरूवातीला नेत्यांना, लोकांना आमिष दाखवायचं, पण खरी वेळ आल्यावर काहीच करायचं नाही, अशीच वागणूक भाजप पक्ष देतो, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
मविआत असताना तिजोरी साफ केली- वडेट्टीवार
या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नेहमीचं हम करे सो कायदा अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये आता ज्यांना असं वाटतंय की निधी मिळत नाही. पण तिजोरीची चावी आता तुमच्याकडेच आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची तक्रार काय करत आहात. तुमची आता धमक दाखवा, महाविकास आघाडीमध्ये असताना तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होतात, आता ही धमक अजितदादांनी दाखवावी. भाजप सोबत आलेल्यांना रडवून रडवून सडवतात. त्यामुळे आता रडण्याची आणि सडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
(हेही वाचा: खोट्या प्रतिज्ञापत्रावरील टीकेला अजित पवार गटाचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले… )