महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक होणार होती परंतु यातील ४ जागांवर बिनविरोध निवड करण्यात विरोधी पक्ष भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आलं आहे. परंतु अकोला आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. यामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसचे छोटू भोयर यांच्या विरोधात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक लढवत आहेत. नाना पटोलेंनी ही निवडणूक काँग्रेस जिंकेल असे भाकीत केलं आहे. यावर नागपूरमध्ये काँग्रेसला अपेक्षित चमत्कार घडणार नाही असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नागपुरात विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेस उमेदवार छोटू भोयर अशी लढत होणार असून त्यात भोयर विजयी होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी काँग्रेसच्या आशा फोल ठरतील. विजय बावनकुळेंचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते काही तरी चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे चांगल्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राणेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची हासत प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा जो दावा केला आहे त्याविषयी विचारले असता मी ते ऐकलं नाही, असे हासत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नागपूरमध्ये भोयर लढतील आणि जिंकतील – नाना पटोले
नागपूरमध्ये लढत होणार असून याची सुरुवात झाली आहे. या लढतीमध्ये काँग्रेसचा विजय होणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली आहे. काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे विजयी होतील असेही त्यांनी सांगितले आहे. नागपूरच्या जागेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही त्यामुळे त्या जागेबाबत चर्चा झाली नाही असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा