देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लादण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले. या आधी केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी – विक्रीला राज्यात परवानगी होती. बाकी सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने तिसऱ्या टप्प्यात दारुबंदीवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दारुविक्री सुरू करण्यात आली. आता दारूच्या दुकानांनंतर राज्यातील मंदिरही खुली करा अशी मागणी पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
काय म्हटलय पत्रात
“महाराष्ट्रात सध्या सर्वच गोष्टींना सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारची दुकानं सुरु झाली आहेत. घरातून बाहेर पडलो तरी रस्त्यावर गर्दी दिसते. मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मंडळीसाठी गाड्याही सुरु झाल्या. सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. दारुची दुकानं तर 2 ते 5 किलोमीटरच्या रांगा लावून सुरु आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकानाबाहेर 4-5 पोलीस रांगा लावताना दिसत आहेत. सगळं असं सुखदायक चित्र आहे. या सर्व गोष्टी सुरु असून कोरोनाचा प्रसार होत नाही. बऱ्यापैकी जनताच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. त्यामुळे आता योग्य त्या नियम अटी घालून राज्यातील मंदिरही मुक्त केली पाहिजे.”
सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा
मनसेने आपली मागणी पत्राद्वारे करताना लवकरात लवकर सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. यात अगदी सर्व धार्मिक स्थळांपासून पर्यटन स्थळांचाही समावेश आहे. मात्र, आता सरकारने दारु दुकानं सुरु केल्यानं इतर गोष्टी सुरु करण्यासाठी मागण्या होताना दिसत आहे.
हे ही वाचा – AIADMK च्या कार्यकर्त्यांनी १४ वर्षीय मुलीला जिवंत जाळले!