मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मशिदींवरील भोंग्यांबाबत भाष्य केलं. त्यांच्या या भाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे धार्मिक वाद होण्याचा आरोप करत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अशातच आता भीम आर्मीनेही राज ठाकरेंच्या सभेला इशारा देत ‘आम्ही सभा उधळवून टाकू’ असं म्हटलं आहे. मात्र भीम आर्मीच्या या इशाऱ्याला मनसेकडून प्रत्युत्तकर देण्यात आलं आहे. ‘कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा ही होणारच’, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
“कोण भीम आर्मी आणि आम्ही त्यांच्या धमक्यांना का घाबरायचं, असल्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा ही होणारच. त्यांचं काय करायचं ते पोलीस बघतील. आम्ही असल्या गोष्टींना महत्वं देत नाहीत”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तसंच, ‘कुणी उठून काही बोलेल त्याला आम्ही का उत्तर द्यायची’, असंही यावेळी संदीप देशपांडे यांनी म्हटले.
भीम आर्मीचा इशारा
“औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. भीम आर्मीने म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोध आहे. या सभेमुळे, राज यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे. हिंदू-मुस्लीम दंगली होणार आहेत, असे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ती सभा आम्ही होऊ देणार नाही. राज यांची सभा उधळून टाकू. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादची सभा उधळून लावायचे काम आम्हीच करू. जो शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. तो प्रत्येक नागरिक या सभेला विरोध करत आहे”, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.
हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?, पोलीस नोटीस देण्याची शक्यता