राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे वेगवेगळ्या शहरांचे दौरे करत आहेत. पुणे, नाशिक नंतर आज राज ठाकरेंनी ठाणे शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा असं सांगत काही सूचना दिल्या आहेत.
ठाण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी आज संवाद साधला. या संवादमध्ये पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कानही टोचले. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या १५-२० दिवसात मी पुन्हा ठाण्यात येईल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी दिल्या आठ सूचना
- सोशल मीडियाचा वापर कमी करा.
- स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील.
- प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार
- २५ दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार
- निवडणुकीच्या तयारीला लागा
- ठाणे महानगरपालिकेत १३० नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.
- अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा
- जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरेंनी दिलं भन्नाट उत्तर