महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाविकास आघाडी सरकारमध्ये भूंकप घडवण्याचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखील ४० आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसणार आहे. या सर्व घडामोडींवर आता मनसेकडूनही जहरी टीका करण्यात आली आहे. असली गुवाहाटीत, नकली ‘वर्षा’वर आणि सेक्युलर गॅसवर अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.
असली गुहाटीत नकली “वर्षा” वर आणि सेक्युलर गॅस वर
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 22, 2022
शिवसेनेसह महाविकास आघाडीविरोधात पुकारत एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह आपला मुक्काम सुरतमधून गुवाहाटीमध्ये हलवला आहे. याच पार्श्वभूमीवर देशपांडेंनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार हे एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला अल्पमतात टाकून स्वतंत्र गट तयार करण्याची रणनिती शिंदेंनी आखली आहे. यामुळे शिंदे भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी तयार करत असल्याची चर्चा आहे. एकूणच शिंदेंच्या या बंडखोरीमुळे आता राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार हे निश्चित आहे.
एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, काल जो गटनेता निवडला गेला तो गटनेता नियमबाह्य निवडला गेला. कारण सर्व आमदारांची निवड पद्धती ही बहुमताने निवडण्याची आहे. परंतु बहुमताचा आकडा आमच्यासोबत असल्यामुळे मला वाटतं की, त्यांनी ज्याप्रकारे निवड केली ही अवैध पद्धतीने करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद आणि रोष होता. त्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत. ही आमदार ३ ते ४ लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सद्सदविवेक बुद्धीला धरून निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे जे काही आमदार आहेत. ते हिंदुत्वाचे मुद्दे, मतदार संघातील मुद्दे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरील मुद्दे असतील, ही या नेत्यांची विचारधारा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.