मुंबई – बॉलिवूड किंग शाहरूख खानचा पठाण चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तुफान गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाचे बुकिंग फुल्ल झाले होते. परंतु, या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना वेळ मिळत नाहीय. सध्या वाळवी, वेड आदी मराठी चित्रपट सुरू आहेत. मात्र, पठाणमुळे या चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची तक्रार संबंधित चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, असा सवाल खोपकरांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांचा आवाज असलेला हरहर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तसंच, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शने केली होती. राजकीय हेतुने या चित्रपटाला विरोध होत असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. चित्रपटाचा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाडांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. हे प्रकरण आता शांत झालेलं असतानाच मनसेच्या अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र डागलं आहे
आता पठाण या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसताना जितेंद्र आव्हाड कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2023
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट काल, बुधवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र, या चित्रपटामुळे मराठीत सुरू असलेल्या चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरले होते. मात्र, पठाण प्रदर्शित होताच या चित्रपटाचे शो कमी करण्यात आले आहेत. तसंच, वाळवी या मराठी चित्रपटानेही प्रेक्षकांसह समिक्षकांची वाहवा मिळवली आहे. मात्र, पठाणमुळे या चित्रपटाकडे थिएटर्समालकांनी पाठ दाखवली आहे. दरम्यान, अभिनय बेर्डे अभिनीत बांबू हा मराठी चित्रपट उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटालाही पठाणचे ग्रहण लागले आहे. यावरूनच हरहर महादेवसाठी हल्लाबोल करणारे जितेंद्र आव्हाड आता मराठी चित्रपटाच्या स्क्रिन्ससाठी पुढे का येत नाहीत, असा सवाल मनसेकडून सातत्याने विचारण्यात येत आहे. पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.