मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनंही खास ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वासामान्यांना लोकल प्रवास करण्यासा मुभा द्यावी यासाठी प६ लिहिलं होतं. या पत्रामध्ये मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीने सुरू करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी लसीचे दोन डोस ज्यांनी घेतेल आहेत, त्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मनसेनं खास ट्विट केलं आहे. “मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,” असं ट्विट मनसेनं केलं आहे.
#MumbaiLocals#मुंबईलोकल pic.twitter.com/k9IlIT1JS3
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 8, 2021