यंदाच्या वर्षी करोनामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असताना हवामान विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सरासरीच्या ९५ ते १०० टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. Monsoon सुरू होण्याआधी वर्तवलेला तो अंदाज आता खरा ठरू लागला असून १ जून ते १९ ऑगस्ट या जवळपास दीड महिन्याच्या काळात महाराष्ट्रात सरासरीच्या १७ टक्के जास्त पाऊस (Monsoon Rain) झाल्याचं दिसून आलं आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती जारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाणीसाठे वाढल्यामुळे सामान्यांना, विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त झालेल्या पावसाच्या प्रदेशांमध्ये जसा पश्चिम महाराष्ट्र आहे, तसाच मराठवाड्यातीलही काही भाग आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळी प्रदेशात पावसानं आत्तापर्यंत चांगली उपस्थिती लावली आहे.
काय सांगते आकडेवारी?
आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास, गेल्या वर्षी १ जून ते १९ ऑगस्ट या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास ७२८.५ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. २०१८मध्ये याच कालावधीमध्ये ५४७.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. २०१९मध्ये या कालावधीमध्ये ७२८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर या वर्षी हे प्रमाण तब्बल ८५१.८ मिलिमीटर इतकं वाढलं आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण १७ टक्के इतकं अतिरिक्त आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील गेल्या १५ दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईकरांना साचलेल्या पाण्याचा किंवा लोकल बंद पडल्याचा तितका मनस्ताप यावेळी सहन करावा लागलेला नाही हे जरी खरं असलं, तरी लोक बंद असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरलेल्या खासगी वाहनांना मात्र प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सध्या ऑगस्ट महिना सुरू असून अजूनही पुढचा संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाळ्याचा असणार आहे. या पुढच्या १ ते दीड महिन्यामध्ये पावसानं अशीच दमदार हजेरी महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये लावली, तर भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेला अंदाज यंदा खरा ठरणार हे निश्चित!