गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची वाट पाहणार्या रोहेकरांची प्रतीक्षा संपली असून, गुरुवारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने ते सुखावले आहेत, तर दुसरीकडे वळगणीचे मासे पकडण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले असून, खवय्येही वळगण घेण्यासाठी आतूर झाले आहेत.
जून महिना संपत आला तरी पाऊस पडण्याचे कोणतेच लक्षण नसताना हवेत निर्माण झालेल्या उष्म्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले होते. हा महिना कोरडा जातोय की काय, असे वाटत असताना पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वांना दिलासा दिला आहे. पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. अडगळीत गेलेले रेनकोटसह छत्र्याही यानिमित्ताने बाहेर निघाल्या असून, छोट्या शाळकरी विद्यार्थ्यांनी या पावसाचा चांगलाच आनंद लुटला. नगर पालिकेने भुयारी गटारे व वीज वाहिन्यांसाठी खोदकाम केल्यामुळे अनेक भागात पाणी तुंबून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दुचाकीस्वारांचीही तारांबळ उडाल्याचेही दृश्य अनेक ठिकाणी नजरेस पडत होते.
या पावसामुळे शेतकरीही सुखावला असून, शेतीच्या कामांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. दरम्यान, वळगणीचे (डोंगर माथ्यावरून किंवा आडमार्गाच्या नाल्यातून पाण्याच्या प्रवाहासोबत नदीकडे जाणारे) छोटे-मोठे मासे पकडण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले असून, मासे प्रेमी खवय्येही वळगण घेण्यासाठी धावाधाव करू लागले आहेत. ग्रामीण भागात वळगणीच्या माश्यांना मोठी मागणी असते.