महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने पुढील 5 दिवस खुप महत्वाचे असणार आहे. हवामान विभागाने आज पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून ते पुढील तीन दिवस मुसळधार पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. यात पुढील पाच दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज गडचिरोली आणि उद्या चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
4 Jul: पुढील 5 दिवसांत मध्य भारत,पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती.
मान्सून TROUGH सक्रिय,पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे.
कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड व GWB वर.
याचा परिणामी महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पावसाचा इशारा.
TC,watch IMD pl
1/2 pic.twitter.com/B2XLShlrrK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2022
दरम्यान मुंबईत काही वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, पालघरमध्येही आज पावसाची दमदार बॅडिंग सुरु आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाच्या हजेरीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान शेतीच्या कामांना देखील सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सातारा, आणि कोल्हापूर भागातही पाऊस सुरु असून या सर्व ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडत असला तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील दादर, माहिम, माटुंगा, वरळी आणि उपनगरीय भागातही धो-धो पाऊस सुरु आहे. याशिवाय ठाणे, कल्याण आणि अंबरनाथमध्येही धुवांधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम दिसून येत आहे. लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे. तर बेलापूर, खारघर, पनवेल परिसरातही मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. वाढत्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.