राज्यात कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेमडेसिवीरीच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामध्ये नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा न करता रेमडेसिवीर बाहेर विकले असल्याचा खळबळजनक आरोप डॉ.हिना गावित यांनी केला आहे. रेमडेसिवीर जिल्हाधिकाऱ्यांनी विकल्याचा दावा गावित यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी म्हटले आहे की, राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मतदार संघातही कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातही कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासते आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मला फोन केला की, आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही. यावरुन दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली आहे. की ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला उपलब्ध करुन दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही.
शेवटी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ५०० इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. तसेच रोटरी वेलनेस सेंटरला १००० इंजेक्शन दिले परंतु दवाखान्यांना विचारल्यानंतर हे इंजेक्शन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी वेलनेस सेंटरने इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले, नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केले आहे. अशा गंभीर आरोप खासदार डॉ. हिना गावीत यांनी केला आहे.
आज नंदुरबारमध्ये रेमेडिसीव्हीरची प्रचंड आवश्यकता आहे. असे असतानाही रोटरी वेलनेस सेंटरने रुग्णांना इंजेक्शन न देता ते बाहेर विकण्याचं काम केलं. दवाखान्यांना अजूनही इंजेक्शन देण्यात आले नाहीत. @IASRajBharud आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हा साठा बाहेर विकला आहे. @DrHeena_Gavit pic.twitter.com/ZUSN7LDpCz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2021
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी होत असल्याचा फायदा काही नफेखोरांनी घेतला आहे. तसेच इंजेक्शनचा काळाबाजारही राजरोजपणे सुरु आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजर करणाऱ्यांवर सीबीआय चौकशी करावी अशी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. तसेच केंद्र सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत २ लाख ६९ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना केवळ ३६ हजार इंजेक्शन केंद्राकडून पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे.