मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल अद्यापही समोर आलेला नाहीये. मात्र, दुसरीकडे हे सरकार १५ दिवसांतच कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यांनी स्पष्टीकरण देत जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या दाव्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही भूकंपाबाबत भीती व्यक्त करत मला टेन्शन येतं, असं मुंडे म्हणाल्या. परंतु संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणाचा बाजूने लागणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रत्येकजण आपापली गणितं मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही. मात्र या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरलयं, असं संजय राऊत म्हणाले.
जळगावमध्ये गुलाबो गँग
जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. ज्यांनी ५० ते १०० कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे जळगावमधले चार ते पाच प्रमुख लोकं आहेत. जे शिवसैनिकांच्या मेहरबानीने जिंकून आले आणि मग विकले गेले. या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत ते सर्वकाही मानतात. ते धमक्या देत असतील तर देऊ द्या. पण जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्या सुवर्णनगरीत काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते. परंतु ते दगडच निघाले. त्याला काय करणार?, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर केली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
हेही वाचा : जळगावात ५० खोक्यांची ‘गुलाबो गॅंग’, संजय राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका