मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, जीआर हे मायबाप जनतेसाठी असतं. कोणाच्याही खासगी कामासाठी नसतं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जीआर आणि मुख्यमंत्र्यांचं समर्थन केलं आहे.
जीआर जनतेच्या भल्यासाठीच…
ठाकरे सरकारकडून जवळपास २५० जीआर काढण्यात आले आहेत. मात्र, त्यावर आता राज्यपालांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, जीआर हे मायबाप जनतेसाठी असतं. कोणाच्याही खासगी कामासाठी नसतं. या जीआरमुळे सामान्य जनता, वंचित, शोषित, पीडित, महिला आणि ज्येष्ठ नागरीक यांसाठीच तर सरकार असते. लोकांची सेवा करणं हे सरकारचं काम आहे. जर सरकारकडून ३५० जीआर काढण्यात आले असतील तर त्याबद्दल तुम्हाला त्यांचं कौतुक केलं पाहीजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
… बाळासाहेबांची आठवण येत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री असावा. त्यांनी ज्या भावना दाखवल्या आहेत. हा खूप मनाचा मोठेपणा असतो. मला आज आर्वजून मान आणि बाळासाहेबांची आठवण येत आहे. कारण मान यांच्यामध्ये असलेली संवेदनशीलता ही सातत्याने उद्धव ठाकरेंच्या कृतीमध्ये सातत्याने दिसून येते. बाळासाहेबांनी सर्वांनाच प्रेम दिलं. ज्यामध्ये मी एक उपभोगता आहे, असं सुळे म्हणाल्या.
बाळासाहेबांनी माझ्यावर लहानपणापासून प्रचंड प्रेम केलं आहे. त्यामुळे बाळासाहेब स्वत: हयात असताना उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची खूप मोठी जबाबदारी होती. आज प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्याने ठाकरे जर आवाहन करत असतील तर मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठा भावनिक आवाहन आहेत. तसेच राजकारणात अनेक चढ-उतार येत असतात. परंतु माणसं आणि नात्यांचा ओलावा फक्त टिकतो.
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि माँ यांनी मिळून बनवली आहे. प्रत्येक समारंभात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माँ असायच्या. त्यांचा स्वभाव हा जवळपास माँ यांच्यासारखा होता. एका कुटुंबाप्रमाणे हा पक्ष नेहमीच राहिला आहे आणि पुढेही राहील, असंही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा : फडणवीस दिल्लीत दाखल, राजकीय चर्चांना उधाण