घरमहाराष्ट्रबाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार कराः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार कराः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

मुंबईः राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करा आणि त्यामाध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांचेसह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीली उपस्थित होते.

- Advertisement -

काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्या. तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला.

माथाडी कामगारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांनी आज राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता. यामुळे नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला होता. त्यामुळे मुंबईतील भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. आज संध्याकाळी माथाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. मुख्यमंत्री आणि माथाडी नेत्यांच्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -