राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१९ अर्थात MPSC परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पहिला क्रमांक प्रसाद चौगुले याने पटकावला असून राज्य सेवा मुख्य परिक्षेत प्रथम येत बाजी मारली आहे. प्रसाद हा सातारा जिल्यातील असून तो सर्वसाधारण वर्गातून पहिला आला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके हा मागासवर्गियांमधून प्रथम आला आहे. यासह महिलांमधून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील हिने बाजी मारली आहे. हा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली
२०१९ ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. या परिक्षेच्या निकालाची कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. शुक्रवारी हा निकाल जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.
४२० विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून होणार निवड
१३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी राज्यातून ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ मुले मुलाखतीसाठी निवडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे तर आता त्यापैकी ४२० विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असे आवाहन केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर १० दिवसांच्या आत ऑनलाईन फॉर्म भरावा.