महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्रमोद चौगुले राज्यात पहिला आलेला आहे. तर निलेश कदम दुसरा आणि रुपाली माने तिसरी आली आहे. मुलाखतीनंतर दोन तासात हा निकाल जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रूपाली माने महिलांमधून पहिली आली आहे. अंतिम निकालाची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.
लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर २०१९मध्ये २०० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मार्च २०२१मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. पूर्व परीक्षेसाठी १ लाख ७१ हजार ११६ उमेदवार बसले होते. हा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला होता. यामधून ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१ मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून ६१५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. यामधील ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर ४ ते २९ एप्रिलदरम्यान मुलाखती झाल्या.
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/Iz57G6NaYF
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 29, 2022