राज्यातील दहावी आणि बारावीचे निकाल जूनमध्ये लागणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल २० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल १० जूनपर्यंत लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. पेपर तपासणीचे काम पूर्ण होत असल्यामुळे निकाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षात झाली आहे. प्रत्यक्षात परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. परंतु बोर्डाकडून उत्तमरित्या उपापयोजना करण्यात आल्या होत्या, विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहे. तसेच बोर्डाच्या परीक्षांचे नियमित निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागत असतात. परंतू यंदा निकाल उशीरा लागत आहेत.
कोरोना आणि शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळेसुद्धा निकाल प्रक्रियेस विलंब झाला आहे. विद्यार्थ्यांचे पेपर झाल्यावरसुद्धा असेच पडून होते. कारण विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार घातला होता. शिक्षकांच्या भूमिकेमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये उशीर होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल २० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा : नवनीत राणांच्या ‘एमआरआय’वर शिवसेनेचे सवाल; लिलावती रुग्णालय प्रशासनाला धरलं धारेवर