एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरचं 4000 हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज (27 ऑक्टोबर) 302 वी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दर तीन महिन्याला नियमित ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील राजकीय सत्तांतरणामुळे चार महिन्यांनंतर ही बैठक होणार आहे.
एसटी महामंडळाला कोरोना आणि संपातून बाहेर काढण्यासाठी महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत. यात प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. ज्यात सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. दोन हजार इलेक्ट्रीक गाडे भाडे तत्वावर घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी आहे, ज्या गाड्या आहेत त्यांची स्थिती देखील वाईट आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्यांची संख्या कमी अशी स्थिती सध्या महामंडळाची झाली आहे. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. याबाबतचा निर्णय शासन दरबारी प्रलंबित आहे. महामंडळ आता उत्पन्न वाढीसाठी विविध स्त्रोतांचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे. महामंडळ उत्पन्न वाढीसाठी महामंडळाची जागा भाडेतत्त्वावर देणार आहे, छोटे-मोठे निर्णय मिळून एकूण 25 निर्णय होण्यासाठी प्रस्तावित यादी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार एस टी महामंडळाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.