एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदा संपाचा मोठा फटका आता एसटी महामंडळाला सहन करावा लागतोय. तब्बल सहा महिने हा संप सुरु होता. यामुळे एसटी महामंडळाला विविध माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. गेल्या सहा महिन्यात एसटी प्रवासी वाहतुकीचा तब्बल 2824 कोटी 6 लाख 91 हजारांचा महसुल बुडाला आहे. तर मालवाहतुकीलाही सुमारे 35 कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच दोन हजार कोटींपेक्षा अधिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला संपामुळे अजूनचं आर्थिक फटका बसला आहे.
एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने बेमुदत आंदोलन सुरु केले. 3 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांना संपाला सुरुवात केली, त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून एसटीच्या 250 आगारांतील सेवा पूर्णपणे बंद होती, बहुतांश ठिकाणी संपकरी एसटी कर्मचारी आणि संघटनांनी एसटीच्या तिजोरीला टाळे ठोकले होते. यामुळे गेल्या सहा महिन्यात एसटीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. याचा सर्वाधिक फटका पुणे विभागाला बसला, त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि नाशिकाही याचा परिणाम सहन करावा लागला.
दरम्यान औरंगाबादमधील नांदेड एसटी आगारालाही सर्वाधिक तोटा झाला आहे. या आगारातून 109 तोटी 09 कोटी 40 लाख 63 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. तर मुंबई प्रदेशात रत्नागिरी आगार(114 कोटी 60 लाख 73 हजार) आणि ठाणे (127 कोटी) तोट्यात आहे. यानंतर पुणे प्रदेशात कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर आगाराला ही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. कोल्हापूरात 132 कोटी 29 लाख 65 हजार, पुण्यात 179 कोटी 82 लाख 42 हजार आणि सातारा 123 कोटी 81 लाख 42 हजार अशी आकडेवारी आहे.