राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास ‘गारेगार’ करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात आणण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबईत एसी लोकलचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “मुंबईकरांची मागणी होती की, तुम्ही एसी लोकल सुरू केली. पण त्याचे दर खूप जास्त आहे. त्यामुळं लोकल त्या लोकलमधून प्रवासही करत नाहीत. त्यामुळं आज या लोकलचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आह”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान एसी लोकलचे दर कमी केल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
“मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानतो की, त्यांनी मुंबईकरांची मागणी मान्य केली. तसंच या निर्णयामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल. चांगल्या सुविधा प्रवाशांना मिळतील”, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. भायखळा रेल्वे स्थानाकाच्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेद्र फडणवीस यांनी एसी लोकलचे तिकीट कमी झाल्याची घोषणा केली.
सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी तुर्त उघडं पाडलंय
यावेळी वाढत्या इंधन दरवाढाबाबत देवेद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “या महाविकास आघाडी सरकारचे लघू दृष्टीकोन आहे. शॉर्ट सायटेड अशा प्रकारचे सरकार आहे. या सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी तुर्त उघडं पाडलंय. 1 लाख 20 हजार कोटी रुपये पेट्रोल डिझेलच्या वॅटवर सरकारने कमावले. आतामात्र दर कमी करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र चुकीच्या पद्धतीने बहाणे केले जाताहेत. देशातल्या भाजपाच्या सर्व राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरचे वॅट कमी करून सर्वसमान्यांना दिलासा द्यायाला पाहिजे.
मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं एसी लोकल सेवा सुरू केली होती. पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्यानं या लोकलला हवातसा प्रतिसाद देखील मिळत नव्हता. तसंच तिकीट दर कमी करावेत अशी मागणी देखील प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती.
हेही वाचा – बाळासाहेब थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरेंची चिंता नसावी : चंद्रकांत पाटील