मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदीवाल समितीने हजर राहण्याचे आदेश दिले आहे. परंतु परमबीर सिंह समितीसमोर हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले जाईल, असं इशारा समितीने दिला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल समितीची स्थापना केली आहे.
चांदीवाल समितीने गुरुवारी परमबीर सिंह यांच्या वकिलांना विचारले की, परमबीर सिंह कुठे आहेत? त्यांना समितीसमोर हजर राहण्यास सांगा, न्यायमूर्ती चांदीवाल म्हणाले की, जामीनपात्र वॉरंट अद्याप प्रलंबित आहे. हे आदेश लागू केले तर परिणाम योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या समोर हजर राहणेचं बरं आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले आहे. मात्र तब्बल ७ महिन्यांनंतर ते गुरुवारी मुंबईत पोहोचले.
परमबीर सिंह मुंबईत दाखल
दरम्यान परमबीर सिंह यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान इतक्या महिन्यानंतर आज परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. बोहो बार अँड रेस्टॉरंटचे मालक बिमल अग्रवाल यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ करत आहे. मात्र फरार घोषित आरोपी परमबीर सिंग हे मुंबई पोहोचल्यानंतर थेट युनिट ११ च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचलेत. मात्र परमबीर यांना ६ डिसेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून संरक्षण मिळालंय त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही. मुंबई आणि ठाण्यात त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत शिवाय स्टेट सीआयडीकडून काही गुन्ह्यांचा तपास केला जातोय.
दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी चांदीवाल समितीसमोर सांगितले की, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना प्रश्न विचारताना माजी मंत्र्यांना न्यायालयातच राहण्यास सांगावे, असे सांगितले. त्यानंतर समितीने अनिल देशमुखला प्रोडक्शन वॉरंट जारी केले. अनिल देशमुख यांचे वकील उद्या दुपारी १ वाजता सचिन वाजे यांची उलट तपासणी करणार आहेत.