घरताज्या घडामोडीचिखलात रुतला मुंबई-गोवा महामार्ग!

चिखलात रुतला मुंबई-गोवा महामार्ग!

Subscribe

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दिवसेंदिवस संथगतीने होत असल्याने आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने महामार्गाचे काम ठप्प झाले. यामुळे नवीन रस्त्याकरिता टाकलेला भराव आणि खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी वाहनचालकांचे कमालीचे हाल होत आहेत.

महामार्गाचे चौपदरीकरण सन २०१४ पूर्वीपासून सुरू आहे. इंदापूर ते पळस्पे दरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे लागल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्ये देखील गती येत नसल्याचे दिसून येत आहे. सन २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकार्‍यांपासून ते मंत्र्यांकडूनदेखील देण्यात आले. मात्र शासकीय परवाने, शेतकर्‍यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून महामार्गाचे काम बंद करण्यात आले. यामुळे पावसाळ्यापूर्वी केल्या जाणार्‍या दुरुस्तीचे काम झाले नाही.

- Advertisement -

महामार्गाच्या दुतर्फा केलेला माती भराव, खोदकाम यामुळे जुन्या रस्त्यावर पावसाळ्यात मातीचा चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही ही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने रस्त्यावर चिखल आणि खड्डे याचेच दर्शन घडत आहे. जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिले नसल्यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाडजवळ दासगावपासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालविताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांतून टाकल्या जाणार्‍या पर्यायी भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे. ठेकेदार कंपनीने आपली यंत्रणा या कामाला लावली असली तरी वारंवार होत असलेल्या या खड्ड्यांमुळे त्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मुलन यावर शासनाने भर दिल्याने या विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णाचे चांगलेच हाल होत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्याचे सोयरसूतक संबंधित यंत्रणांना बिलकूल नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -