राज्यात अनलॉकिंगचा टप्पा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई वाहतुकीचा वापर प्रवासासाठी केला आहे. राज्यात २५ मे पासून अनलॉकिंगच्या टप्प्यात विमान प्रवासासाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून २४ जूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टने २ लाख १२५८ प्रवाशांची वाहतुक सुलभ करून दिली आहे.
या २ लाखांहून अधिक प्रवाशांमध्ये १ लाख ४० हजार ८७८ प्रवाशांनी डिपार्चरचा पर्याय निवडत मुंबई शहराबाहेर प्रवास केला. तर ६० हजार ३८० प्रवाशांनी अरायव्हलचा पर्याय निवडत मुंबईत प्रवेश केला. अनलॉकिंगच्या टप्प्यात २५ मे पासून ते २४ जूनपर्यंत १० एअरलाईन्सच्या माध्यमातून देशातील एकुण ३४ भागांमध्ये हवाई मार्गे सेवा पुरविण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक प्रवासी वाहतूक ही मुंबई ते दिल्ली या प्रवासादरम्यानची होती. तर त्यापाठोपाठ कोलकाता, वाराणसी, पटना या शहरांमध्ये सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली.
मुंबई दिल्ली या मार्गावर ४१ हजार २०६ प्रवाशांनी अनलॉकिंगनंतर प्रवास केला. तर मुंबई ते कोलकाता या मार्गावर २२ हजार ७७८ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई ते वाराणसी या मार्गावर १८ हजार ८१२ प्रवासी तर मुंबई ते पटना या मार्गावर १७ हजार ७८४ प्रवाशांनी प्रवास केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शकांनुसार दिवसापोटी फक्त २५ डिपार्चर आणि २५ अरायव्हल्सनाच परवानगी होती. तसेच महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्मशिअल फ्लाईट्सना परवानगी वाढवल्याने देशाच्या आणखी सहा भागांमध्ये प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यामध्ये तिरूवनंतपुरम, कोइंबतुर, रायपूर, उदयपूर, जबलपूर, जळगाव या भागांचा समावेश होता.