मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही आतापासूनच कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेनं वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तयारी केलीय. वाढत्या कोरोना रुग्ण पाहता मुंबईत लॉकडाऊनही होण्याची शक्यता मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केलीय. मुंबईत रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्या वर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इक्बाल चहल यांनी सांगितलं. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीय, त्यावेळी ते बोलत होते.
आता मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेलाय. नागरिकांनी स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावेत, असं आवाहनही इक्बाल चहल यांनी केलंय. महापालिकेकडे 30 हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, सगळी तयारी झालेली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
मुंबईत 3 जानेवारीला 8 हजार 82 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी 622 रुग्ण बरे झालेत. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इक्बाल चहल यांनी महत्वाचा इशारा दिला. मुंबईतील रुग्णसंख्या अशीच वाढत राहून एका दिवसात 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन करावाच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत ओमिक्रॉनचे नवे 40 रुग्ण
राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 578 वर गेली असून, 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाल्याची माहिती मिळालीय. सोमवारी राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळलेत.
मुंबई, ठाणे,नवी मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात कोरोनाचा डेल्टा आणि ओमायक्रॉनचा कहर वाढल्याने येथील इयत्ता १ ली ते ९ वी आणि इयत्ता ११ वीच्या सर्व शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविडचा संसर्ग आणखीन वाढत गेल्यास पुन्हा एकदा मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू होणार आहे. राज्य शासन व मुंबई महापालिकेने मुंबईत कोविड व ओमायक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.