महाराष्ट्रात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानाने उच्चांक गाठला असून मुंबईत मंगळवारी ४१ डिग्री तापमानाची रेकॉर्ड ब्रेक नोंद करण्यात आली आहे. १९५६ नंतर पहिल्यांदा मार्च महिन्यात मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये मंगळवारी ४१ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर पुढील दोन दिवसात पुणेकरांचाही चांगलाच घामटा निघणार आहे. मुंबईसारखीच परिस्थिती पुढील दोन दिवसात पुण्यातही असण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज पुण्यातील अनेक भागांमध्ये ३७ ते ३९ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात १७ ते १९ मार्च दरम्यान ४० – ४१ डिग्री तापमाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (maharashtra heat wave mumbai recorded 41 degree celsius today is highest in march after 1956)
Pune Tmax 15 March pic.twitter.com/RIfKE4lwZJ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 15, 2022
महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रातील अनेक भागांमध्ये तापमान ४० डिग्री सेल्सिअसने पुढे सरकले आहे. तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली आहे. आतापर्यंत मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड आणि कर्जत जिल्ह्यात सर्वाधिक ४४.२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज परभणीत ३८.०२ तर वाशिमध्ये ३९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी मुंबईत अनेक भागात ४० डिग्री सेल्सिअस तापमान होते. याआधी १९५६ साली मार्च महिन्यात मुंबईतील तापमान ४१ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
कोकणात ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि कोकणाला अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टी भागातील तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंशांनी अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच दुपारनंतर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हेही वाचा – Heat Wave : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तीव्र उष्णतेची लाट; IMD चा सावधानतेचा इशारा