अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. आघाडीने सोमवारी आपला निवडणूक जाहीरनामा मुंबईत प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-सेना युती यांच्यात जागावाटपाची चर्चा अद्याप सुरूही झालेली नसताना वंचित आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून ‘एकला चलो रे’ धोरण जाहीर केले आहे.
मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला होता. यावेळीही वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पोटात गोळा येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सरकार आल्यास पोलिसांची ड्युटी ८ तासांची करणार, होमगार्ड्सना पगारी कामगार म्हणून सेवेत घेणार, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. त्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री असताना त्यांनी पोलिसांना केवळ आठ तासांची ड्युटी असली पाहिजे, असे म्हटले होते. परंतु, दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेले काम अद्याप झाले नाही.