घरठाणेअंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये येणार नाही, पालिकेचे मुख्याधिकारी गोडसेंचं मोठं वक्तव्य

अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये येणार नाही, पालिकेचे मुख्याधिकारी गोडसेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

बदलापूर शहरात मागील काही दिवसांपासून कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये नको अशी भूमिका घेत बदलापूरमधील विरोधी पक्षांनी आंदोलन केली आहेत. तर महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना दोन दिवसांपूर्वी घेराव घातला होता. हा प्रश्न आपण शासन दरबारी मांडावा आणि बदलापूर शहरात अंबरनाथ चा कचरा आणू नये अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीने आणि मनसेने केली. दरम्यान यावर उत्तर देताना पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये येणार नाही, अशी भूमिका घेत कचरा प्रश्नाला पूर्णविराम दिला.

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वप्नातील कचरा प्रकल्पाला बदलापूरकरांनी विरोध केला आहे. बदलापूरच्या वालीवली परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर, कल्याण लोकसभेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अद्ययावत कचरा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. स्पेनच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पात अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. याबाबत खासदार कपिल पाटील यांना विचारले असता आम्ही जन भावने सोबत आहोत असं म्हणत अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाला विरोध केलाय.

- Advertisement -

मात्र प्रत्यक्षपणे विरोध करण्याचं खासदार कपिल पाटील यांनी टाळले. अंबरनाथ पालिकेला बदलापूरच्या वालीवली इथं कचरा टाकण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पालिकेला आठ मार्चला पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि मनसेनं ड्रीम प्रोजेक्टला विरोध करत, अंबरनाथ पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा बदलापूरमध्ये कचरा टाकू नये अशी भूमिका घेत तीव्र निषेध केला. याबाबत त्यांनी बदलापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील भेट घेतली.

महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनात माझ्यावर टीका केली. मात्र या कचरा प्रकल्पाबाबत मी आधीच स्पष्ट केले आहे. की भाजप जनभावने सोबत आहे. आम्ही जनतेच्या भावनेचा आदर करतो. त्यामुळं जनतेचा प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही जनतेसोबत आहे.

कपिल पाटील, केंद्रीय मंत्री

 

जनतेने सुद्धा आमच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला आहे. बदलापूरकरांची इच्छा आहे की आमच्या शहरांमध्ये इतर शहरांची घाण नको आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या आमच्या आरोग्यावर, रोगराईवर, आमच्या विकासावर परिणाम होईल, आणि जनतेने सांगितलेले आहे ठरवलेले की सर्व पक्षांची जी भूमिकाआहे त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर आम्ही जनता सुद्धा आपल्याबरोबर आहोत.

संजय जाधव, शहराध्यक्ष ब्लॉक काँग्रेस.

 

हा प्रकल्प बदलापूर शहरासाठी महत्त्वाचा आहे. मात्र ज्या पक्षांनी शहरात दहा रुपयाची विकास कामे केली नाहीत त्यांनी आंदोलन केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे लाचारीचे काम करत नाहीत, खासदार पदावर असताना मतदारसंघात आणि आजूबाजूच्या शहरात चांगला प्रकल्प असावा असे खासदारांचं स्वप्न आहे, म्हणून त्यांनी हा प्रकल्प मंजूर केला आहे.

– वामन म्हात्रे, शहरप्रमुख वामन म्हात्रे.

 

अंबरनाथ पालिकेला बदलापूर शहरात कचरा टाकण्यासाठी परवानगी दिली नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून बदलापूर पालिकेला कोणतेही पत्र किंवा आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळं याबाबत नागरिकांनी कुठलाही संभ्रम नागरिकांनी बाळगू नये. अंबरनाथ पालिकेला बदलापूर शहरात टाकता येणार नाही.

– योगेश गोडसे, मुख्याधिकारी कु.ब.न.प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -