महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डावा होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनी बोलताना केला. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून उलटसुटल चर्चा सुरु आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरेंनी बंद केले. 5 वर्षे आम्ही सत्तेत होतो तरी ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करुन मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांनी दिलं होतं.
फडणवीसांनी केलेले आरोप मात्र आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले हे मी ऐकलं नाही. मात्र त्यांनी जो आरोप केला, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील, मात्र मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नाही, अस स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.