धुळे महापालिका निवडणुकीसाठी शासकिय यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली गेली असल्याचा आरोप धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.देशआत निवडणुकीवर परिणाम होईल अशी अद्दल घडवेल असा इशारा अनिल गोटे यांनी भाजपला दिला आहे. धुळे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्यांना तीन अपत्त्ये आहेत, ज्यांची अतिक्रमणे आहेत, ज्यांनी ओपन स्पेसमध्ये बांधकामे केली आहेत. त्यांचे अर्ज फेटाळण्याऐवजी स्विकारले गेले आहेत. हरकत घेणार्यांनी अधिकार्याला जाब विचारला तर ते म्हणतात, हायकोर्टात जा. मी मुख्यमंत्र्यांना विचारतो अशा पध्दतीने निवडणुक जिंकणार आहात का? तुमची प्रतिमा स्वच्छ, चांगली आहे. त्यामुळे एवढ्या छोट्या महापालिकेसाठी प्रतिष्ठा पणाला लावू नका. चार राज्यात निवडणुका आहेत हे विसरु नका, अशाच पध्दतीने निवडणुकीचा कारभार सुरु असेल तर देशाच्या निवडणुकीवर परिणाम होईल अशी अद्दल घडवेल असा इशाराच आमदार अनिल गोटे यांनी भाजपला दिला आहे.
लोकसंग्राम पक्षातर्फे लढवणार निवडणुक
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि भाजप आमदार अनिल गोटे यांच्यात रणकंदन माजले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तीन तास बैठक घेऊनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सर्वाधिकार गोटे यांच्याकडे दिल्याचे बोलले जात होते. मात्र आपल्यासोबत दगाफटका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून गोटे यांनी आगामी निवडणूक लोकसंग्राम पक्षातर्फे लढवणार असल्याचे सांगितले.