मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा गाजत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मांडला. मंत्रालयावर १९८२ साली मोर्चा काढला होता. मात्र, त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आत्महत्या केली, असा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी १९८२ साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.
काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली – विनायक मेटे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. १९८२ मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला. याशिवाय शनिवारी निघणारा मोर्चा हा १०० टक्के निघणार असून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असं मेटेंनी स्पष्ट केलं.