नागपूर : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि देशातील लोक स्वतंत्रतेने जगू लागले. पण आजही काही लोकांना स्वातंत्र्याचा खरंच उपयोग होत आहे. लोकशाही असलेल्या भारतात आजही अनेक ठिकाणी गरीबांना हुकूमशाहीसारखी वागणूक मिळत आहे. भारत स्वतंत्र झाला असला तरी अद्यापही काही समाजातील लोकांना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. परंतु, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आदिवासी विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे. (Nagpur bench gave justice to tribal student on Independence Day)
हेही वाचा – मुंबईत गावठी दारू प्यायल्याने विषबाधा; एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक
15 ऑगस्ट या दिवशी सर्वांना सुट्टी असताना एका आदिवासी विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवले. विद्यार्थ्याची गरज लक्षात घेता नागपूर खंडपीठाने कामकाज चालू ठेवून त्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला. गौरव वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने घेतलेल्या एका निर्णयामुळे या विद्यार्थ्याच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव वाघ हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. त्याला प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र हवे होते. परंतु, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने 10 नोव्हेंबर 2022 ला त्याचा माना अनुसूचित जमातीचा त्याने केलेला नामंजूर केला होता. ज्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात गौरवने याचिका दाखल केली.
काल (ता. 16 ऑगस्ट) अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गौरवला दुपारी 03 वाजेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि महेंद्र चांदवाणी यांनी या प्रकरणावर 15 ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू ठेऊन सुनावणी घेतली. यावेळी रेकॉर्डवरील पुरावे पाहता पडताळणी समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द केला आहे. तसेच, गौरवला माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा आदेश देखील न्यायालयाने दिला आहे. याआधी गौरवच्या वंशावळीतील सात सदस्यांना माना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. त्यामुळे असे असताना सुद्धा त्याला वैधता प्रमाणपत्र नाकारले गेले होते. गौरवतर्फे ॲड. प्रिती राणे यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला होता.