नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद केली. त्यामुळे नागपूरमध्ये पुरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे सुमारे 400 जणांचे सुखरूप स्थलांतर करण्यात आले. हवामान खात्याने येत्या 24 तासात जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याचपार्श्वभमूवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालिकेच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Nagpur Flood Havoc due to heavy rain in Nagpur Financial assistance announced by Deputy Chief Minister)
हेही वाचा – PHOTO : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती; आतापर्यंत 500 लोकांची सुटका
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची आढावा बैठक पार पडली आहे. नागपुरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपुरात कमी वेळात 109 मिमी पावसाची नोंद झाली असून अवघ्या दोन तासांत 90 टक्के पाऊस पडला. त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाला. त्यातूनच नाग नदी, पिवळी नदीत पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे आतापर्यंत दोन मृत्यू झाले असून पुन्हा एक बॉ़डी सापडली आहे. शिवाय 14 जनावरांना मृत्यू झाला आहे. जवळपास 10 हजार घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं असून अनेक दुकांनाचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर, दुकानाचं नुकसान झालेल्यांना 50 हजार रुपये आणि छोट्या दुकानदारांना 10 हजार मदत देणार आहे. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचं फडणवीसांनी नमूद केले.
हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची ताकद…; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंचे लक्षवेधी ट्वीट
मुसळधार पावसामुळे ज्या पुलाचं नुकसान झालं आहे ते नव्याने बांधले जातील. त्यासाठी राज्यशासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे आम्ही टीम तयार ठेवल्या आहेत. सध्या शहरातील पाणी उतरायला सुरूवात झाली असल्यामुळे ज्या भागात वीज बंद केली होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.