नागपूर – महाराष्ट्रातील ठेकेदारांचे 92 हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकले आहेत. त्यांनी आता कामबंदचा इशारा दिला आहे. यावर राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले एवढे मोठे बहुमत मिळूनही हे सरकार अस्थिर आहे. फक्त कंत्राटदारांची बिलं थकली नाहीत, तर शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आदिवासी विभाग, निराधार, रोजगार हमी योजना असे सर्वच विभाग आणि योजनांची बोंबाबोंब झाली आहे. असे सरकार महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नाही, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावल.
मागील 8 महिन्यांपासून ठेकेदारांचे 92,300 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. या पैशांची वाट पाहणऱ्या ठेकेदारांनी आता सरकारला काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. पीडब्ल्यूडी, ग्रामविकास, जलसिंचन, जलजीवन मिशन अशा विविध कामांचे हे पैसे थकलेलेल आहेत. यावर वडेट्टीवार म्हणाले की, ठेकेदारांनी हा काही पहिल्यांदा इशारा दिलेला नाही तर हा तिसऱ्यांदा इशारा देण्यात आला आहे.
सर्व विभागांमध्ये बोबाबोंब
काँग्रेस आमदार वडेट्टीवार म्हणाले की, “पीडब्ल्यूडीच्या कंत्राटदारांचे 46 हजार कोटींची थकबाकी आहे. इरिगेशन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाचे यावर्षी 270 कोटी बजेट असताना 1300 कोटींची कामे झाली आहेत. आता हे पैसे देणार कुठून? कंत्राटदारांचेही पैसे मोठ्या प्रमाणात थकीत आहे. कुणालाच पैसे मिळत नाही. सर्व योजनांची आणि विभागांमध्ये बोंबाबोंब आहे,” असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
बोलाचीच कढी, बोलाचाच भात
वडेट्टीवा म्हणाले, “विदर्भातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव सहा महिन्यापासून प्रलंबित आहे, पैसे मिळालेले नाही. शेतकरी, अंगणवाडी सेविका, जलजीवन मिशनचे 1800 कोटी रुपये वर्षभरापासून केंद्र सरकारकडून मिळालेले नाही. त्यामुळे ती योजना बंद पडली आहे. निराधार योजनेतील गरीबांना चार महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत, रोजगार हमी योजनेचे पैसे सहा महिन्यांपासून मिळत नाहीत, कुठेही पैसे मिळत नाही. नुसती बोलाचीच कढी, बोलाचाच भात असे हे सरकार चालू आहे. याच्यासाठी सरकार आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की, “सरकार अजूनही स्थिर झाल्याचे लक्षण नाही. ही अस्थिरता हिस्से वाटणी वरून आहे. प्रचंड बहुमत मिळूनही असे अस्थिर सरकार महाराष्ट्राने पाहिलेला नाही.”