घरताज्या घडामोडीमुंबई-गोवा महामार्गाला 'कान्होजी आंग्रें'चे नाव द्या - संभाजीराजे भोसले

मुंबई-गोवा महामार्गाला ‘कान्होजी आंग्रें’चे नाव द्या – संभाजीराजे भोसले

Subscribe

संभाजी राजे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं पत्रच लिहिलं आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला महान शिवभक्त व स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. संभाजी राजे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं पत्रच लिहिलं आहे. संभाजी राजे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे अलौकिक कार्य आपणास माहीतच आहे. महाराजांनी अनेक क्षेत्रात महनीय कार्य केले. आपणास हा इतिहास ठाऊकच आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरमाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक म्हटले जाते. महाराजांनी त्या काळात आरमाराचे महत्त्व ओळखून स्थापना केली. जेव्हा समकालीन मुघलांनी किंवा इतर राजांनी विचारही केला नसेल, असे संभाजी राजे यांनी सांगितले आहे.

स्वराज्याच्या सागरी सीमांचं रक्षण करताना कान्होजींनी दिलेल्या योगदानाला तोड नाही. कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. कान्होजी आंग्रेंनी औरंगजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे १७२९ सालापर्यंत मराठा साम्राज्याची अहर्निश सेवा करून इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंवरही दहशत निर्माण केली. त्यांच्या पराक्रमाचे शेकडो पुरावे इंग्रज व पोर्तुगीजांच्या दप्तरात जागोजागी सापडतात. हिंदुस्थानचा आरमारी इतिहास कान्होजी आंग्रे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं संभाजी राजे यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

नौदल प्रमुखांच्या कार्यालयाबाहेर कान्होंजींचे स्मारक

‘दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमधील नौदल प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात कान्होजींचं स्मारक आहे. आपल्या नौदल प्रमुखांनी आद्य नौदल प्रमुखांना सॅल्यूट करूनच कार्यालयात जावे, अशी कदाचित त्यामागची संकल्पना असेल. कोकणच्या भूमीत जन्मलेल्या या महान सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहास प्रेमींच्या मनातली ही मागणी असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल, असा ठाम विश्वासही संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -