मुंबई : “परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि संविधानाला मानणाऱ्या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच, संविधानाची विटंबना करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. (Nana Patole congress on parbhani ambedkar statue vandalism protests)
परभणीत घडलेल्या घटनेवर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच, पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मलईदार खाती आणि मंत्रिपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न माननाऱ्या विचारांचे लोक सत्तेत आहेत, त्यामुळे असे प्रकार घडतात.” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
“परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर शहरात पोलीसांनी आंबेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलीस आणि प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करावे,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा, असे आवाहनही पटोले यांनी केले.