मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या विधानाशी भाजपा व नरेंद्र मोदी सहमत आहेत का? याचा पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Nana Patole was angry with those who spoke of changing the constitution)
हेही वाचा – शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे हाल, शरद पवार गटातील आमदाराने केली मदत
टिळक भवन येथे प्रसार माध्यामांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांचा खरपूर समाचार घेतला, यावेळी बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देशाला दिले आहे. या संविधानाने वंचित, मागास, दलित, अल्पसंख्याक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले समाजातील सर्वात शेवटच्या पंक्तीतील नागरिकांना न्याय मिळेल याची तरतूद केली. सर्वांना समान हक्क, अधिकार व न्याय दिला परंतु संविधान न माननारे काही लोक आपल्या देशात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या परिवारातील संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच विवेक देबरॉय व रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, अशी मागणी पण यावेळी नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली.
राज्यातील परिस्थिती गंभीर, राज्यपालांनी लक्ष घालावे..
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या झाल्या नाहीत, काही भागात दुबार पेरणी करावी लागली पण पिक उगवले नाही. शेती पंपाला लागणारी वीज 12 तास देण्याची घोषणा केली पण 8 तासही वीज मिळत नाही. धानाला बोनस दिलेला नाही, कांद्याचे अनुदान मिळालेले नाही, कापूस घरातच पडून आहे. अतिवृष्टीची नुकसानभरपाईही अजून मिळालेली नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. 36 जिल्ह्यांना 19 पालकमंत्री अशी अवस्था असल्याने प्रशासन ठप्प आहे, लोकांची कामे होत नाहीत. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यपाल यांनी यात हस्तक्षेप करावा, असेही नाना पटोले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
राहुल गांधींना बदनाम करण्याचे प्रयत्न..
अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे आडनाव हे गांधी नसून खान आहे, असा दावा केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करते, पण त्यांची प्रतिमा आणखीनच उजळून निघालेली आहे. राहुल गांधी यांच्या आडनावावरून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न याआधीही केला गेला आहे. जे लोक राहुल गांधींच्या आडनावाचा मुद्दा उपस्थित करतात त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे, महागाई, बेरोजगारी या विषयावर बोलावे. ज्यांनी आडनावाचा प्रश्न उपस्थित केला त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही.