शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कोकण दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पिता-पुत्रांवर टीका केली होती. अंधारेंनी केलेली टीका राणेंच्या जिव्हारी लागली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे. तिला माझ्यावर टीका करायला इथे आणलं, याचा अर्थ शिवसेना संपली ना, असं नारायण राणे म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चित्रा वाघ यांच्या समवेत कणकवलीत राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले की, माझ्यावर टीका करायला शिवसेनेत आता राहिलंय कोण? म्हणून तिला आणलंय. शिवसेनेत उभी फूट पडतीये, याचा आनंद आहे. तिला माझ्यावर टीका करायला इथे आणलं, याचा अर्थ शिवसेना संपली ना, असं म्हणत नारायण राणेंनी अंधारेंवर टीका केली.
शिवसेनेचं दुसरं पिल्लू आहे ते कुठल्याही बिळात शिरतंय. बिहारला जातात काय?, कोणालाही मिठी मारतो काय, त्यांनी कितीही मिठ्या मारल्या तरी सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात ते सुटणार नाहीत, कारण आम्हाला वास्तव माहिती आहे. आम्ही त्याला सोडणार नाही, असा धमकी वजा इशारा नारायण राणेंनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना दिला.
काँग्रेसवर आगपाखड
काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होतं. परंतु काँग्रेसने काय केलं?, आतापर्यंत किती भारत जोडला काँग्रेसने, एवढी यात्रा संपली की ते इटलीला जातील, असं म्हणत राणेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
हेही वाचा : वाचाळपणा करत राहिलात तर भविष्यात एकटेच राहाल, विखे पाटलांचा ठाकरेंना टोला