हे कसले मुख्यमंत्री? पिंजऱ्यात राहतात असा खोचक टोला केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी (Narayan Rane) लगावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. राणेंनी परळमधील नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेची सत्ता तुमच्या हातात राहणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी परळमध्ये जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संवाद साधताना शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. गरिबी का जात नाही दारिद्र्य का संपत नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
हे कसले मुख्यमंत्री
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कुणी आहेत असं मला वाटत नाही. काही दम नाही हे कसले मुख्यमंत्री ? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. जनतेत यायला पाहिजे, प्रश्न काय आहेत बघायला पाहिजे, मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेची मुंबईवर ३२ वर्ष सत्ता आहे. या ३२ वर्षांत मुंबईत बकाल करुन टाकली आहे. कोरोनामुळे अनेक लोकं मुंबईत दगावले आहेत. कोरोनाच्या काळातही शिवसेनेने औषधामध्ये पैसे खाल्ले आहेत. आमच्यावर अशी वेळ आणून नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन असा सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीचं परिवर्तन झालं
नारायण राणे यांनी मातोश्रीवरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. गरिबी का जात नाही दारिद्र्य का संपत नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही. मोतश्रीचं परिवर्तन झालं. एकाचे दोन बंगले झाले मराठी माणसाच्या जीवनामध्ये काहीही फरक नाही. आजही मराठी तरुणांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिक घरी जातो तेव्हा चुल पेटली की नाही, आईने काही शिजवलं असेल की नाही, ही चिंता असेल त्याला, ही वेळ का आली? असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं? राणेंचा सवाल