घरमहाराष्ट्र'मी ३९ वर्ष शिवसेनेत होतो, यांना मराठ्यांना आरक्षण द्यायंच नव्हतं'; नारायण राणेंचा...

‘मी ३९ वर्ष शिवसेनेत होतो, यांना मराठ्यांना आरक्षण द्यायंच नव्हतं’; नारायण राणेंचा गंभीर आरोप

Subscribe

मराठा आरक्षणावरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना मी जवळून पाहिलं आहे. ३९ वर्षे मी सेनेत होतो, सेनेच्या नेत्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. मराठा आरक्षणबाबात सर्वोच्च न्यायालयाने निकाल व काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची या संदर्भात भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. “मी शिवसेनेत ३९ वर्षे राहिलेलो आहे, त्यांच्या नेत्यांना जवळून पाहिलेलं आहे, खरंतर यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, मनात नव्हतं. आता जे दाखवता आहेत, त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक आहे. हे रद्द झाला याचा त्यांना उलट आनंद आहे, त्यांना दुःख झालेलं नाही,” असं राणे म्हणाले.

- Advertisement -

मराठा आरक्षणासंबधी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यात न्यायालयात आरक्षणासंबंधी जी स्थगिती होती ती रद्द केलेली आहे. आरक्षण नाही असा निर्णय.. किंवा महाराष्ट्राला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे. मराठा आरक्षणासाठी हे तीन पक्षांचं सरकार किती आग्रही होतं? त्यांची किती मानसिकता होती? आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी काय तयारी केली होती? कोण कोणत्या वकिलांशी मुख्यमंत्री आणि ही समिती हे जे आता मंत्री गेले होते, त्यांनी काय अभ्यास केला? हा जो प्रस्ताव न्यायालयासमोर महाराष्ट्राने पाठवला आहे, तो प्रस्ताव काय आहे? यापूर्वी १०२, १०३ घटना दुरूस्ती झाली आहे. इंद्रा सहानी समितीचा अहवाल समोर आहे. याला वगळून राज्य सरकारने जो राणे समितीने अहवाल दिला, त्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात पाठवला. सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर आता हे राज्यपालांकडे जात आहेत आणि सांगत आहेत की आता, सर्वोच्च न्यायालयाने सांगतिलं आहे की सर्व अधिकार केंद्र व राष्ट्रपतींचा आहे. म्हणून मुख्यमंत्री म्हणतात की आता केंद्राने पाहावं. म्हणजे आपली जबाबदारी झटकण्याचं काम या शिष्टमंडळाने केलं, अशी टीका राणेंनी केली.

मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कोमता प्रश्न सोडवला?

या मुख्यमंत्र्यांनी राज्यासमोर जे विविध प्रश्न आहे, त्या संबंधी काय केलं? कोणता प्रश्न सोडवला? असा सवाल राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. खरंतर यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, सर्वोच्च न्यायलायने जो निकाल दिला आहे, आरक्षण नाकारला आहे ते का नाकारलं त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. केवळ केंद्राकडे बोट दाखवून प्रश्न सुटत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

- Advertisement -

अगोदर राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जी मागणी केली होती, त्याला घटनेचा आधार काय होता? नियमांचा काय होता? मागासवर्गीय समितीचा काय होता? याचा अभ्यास करायला पाहिजे. सगळं काही अशोक चव्हाण करतील आणि मग हे काय करतील? मास्क लावा आणि हात धूवा एवढंच सांगत बसतली काय? असा टोला राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

या सरकारने सोमवारी राज्यपालांकडे जाऊन आपले हात झटकलेले आहेत. जरी यांनी हात झटकले तरी मराठा समाज यांना सोडणार नाही. केंद्र काय निर्णय घ्यायचा तो घेईल. पण आम्ही यांना इथं पकडणार की तुम्ही तो सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल जो आहे, त्याला अपील करा. केंद्र सरकारला सांगा करायला. केंद्राला सांगायला तसे संबंध देखील तयार करावे लागतात. उठसूठ केंद्राला दोष देतात, असं राणे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -