शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत युती करण्यासं सुचवल्याने खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेकडून मैत्रिचा हात समोर आला आहे, हातात हात मिळवावासा जरी वाटला तरी त्याचा अधिकार केंद्र ठरवतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या हातामध्ये हात मिळवायचा की नाही हे खासगीमध्ये जरी आम्हाला वाटत असलं तरी पक्ष म्हणून धोरण ठरवण्याचे अधिकार हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांना आहेत. शिवसेनेत एकाधिकार शाही आहे. सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. पण आमच्यात तसं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राऊत कंपाऊंडर डॉक्टर आहेत
सत्ता बदलाबाबत बोललो की अग्रलेख येतो. आमच्या पोटात दुखतं, आम्हाला झोप लागत नाही, हे राऊतांना कळतं. कारण ते कंपाऊंडर डॉक्टर आहेत ना, असा टोला संजय राऊत यांना लगावला. तसंच नजिकच्या काळात बदल होणार की नाही हे मला सांगता येणार नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगतिलं.