करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असली तरीही ज्यांना स्वत:चे हक्काचे छतच नाही असे बेघर लोक मात्र रस्त्याच्या कडेलाच गर्दी करुन राहत असल्याचे निदर्शनास येते. याशिवाय गोदावरी किनारी भिकार्यांचीही गर्दी बघायला मिळते. अशा सुमारे १४०० बेघर आणि भिक्षेकर्यांना महापालिकेने आपल्या निवारागृहांमध्ये सक्तीने स्थलांतरीत करावे अशी मागणी आता पुढे आली आहे.
नाशिक ही सिंहस्थनगरी असल्याने शहरात भिकार्यांची संख्या मोठी आहे. यातील बहुसंख्य भिकारी गोदावरी नदीकिनारीच वास्तव्यास असतात. त्याचप्रमाणे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, पंचवटी, डोंगरे वसतीगृह, मुंबई नाका यांसह ठिकठिकाणी बेघर लोक रस्त्याच्या कडेला वास्तव्य करताना आढळून येतात. कामाच्या शोधार्थ नाशकात आलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या गावांकडचा रस्ता धरला आहे. त्यामुळे आता शहरात भिकारी आणि पाल टाकून असलेले बेघर लोकच वास्तव्यास आहेत. बेघर लोकांच्या पुर्नवसनासाठी कार्यरत असलेल्या सेवा संस्थेच्या सर्वेक्षणानुसार शहरात जवळपास १४०० बेघर लोक राहतात. या बेघरांपैकी दुर्देवाने कोणाला करोनाचा संसर्ग झाल्यास तो लवकर लक्षातही येणार नाही. तसेच बाधित व्यक्ती शहरभर सैरावैरा फिरत असल्याने हा संसर्ग पसरण्याचा धोकाही संभवतो. यामुळे यापुढील काळात सर्वच बेघरांना महापालिकेने आपल्या निवारागृहात स्थलांतरीत करावे अशी मागणी पुढे आली आहे.
गोदावरी नदीकिनारी थंडीमुळे तिघा भिकार्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा महापालिकेने सहा निवारागृहाची व्यवस्था महापालिकेने केली असल्याचा दावा केला होता. या निवारागृहांमध्ये तातडीने रस्त्यावरील भिकारी आणि बेघर लोकांना स्थलांतरीत करण्यात यावे. अन्यथा करोनाचा संसर्ग पसरु शकतो.
-राजपालसिंग शिंदे, अध्यक्ष, सेवा संस्था