येवला तालुक्यातील नागडे या गावातील भारती साताळकर यांनी राज्य लोकसेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या महिला व बालकल्याण अधिकारी या परीक्षेत यश संपादन केले आहे. यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान त्यांनी मिळविला. जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नागडे या छोट्याशा गावातील शेतकरी कचरू साताळकर यांची हि कन्या. एमपीएससी मधून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रोज आठ ते दहा तास अभ्यास करत हे यश संपादन केले. मागील वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या या सरळसेवा परीक्षेचा निकाल २१ तारखेला दुपारी एमपीएससीच्या साईटवर प्रकाशित झाला.
ग्रामीण भागातील मुलींना त्यांचे करिअर निवडण्याची संधी द्यावी, कारण ग्रामीण भागात वयाच्या २१ नंतर आई वडील स्थळ पाहणी कार्यक्रम चालू करतात, ते न करता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊन द्यावे तसेच मला ग्रामीण भागातील मुलींकरता मार्गदर्शकाची भूमिका बजवायची असून जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते, अभ्यासाच्या काळात सोशल मीडियापासून दूर राहावे. मला एवढ्यावरच न थांबता जिल्हाधिकारी व्हायचे आहे , त्यादृष्टीने तयारी चालू आहे.